कसे वागावे ?
असा कसा हा
विपरीत काळ आला ।
काय म्हणावे या
कलियुगाला ?
' धर्मराज' म्हणती येथे
खोटे बोलणाऱ्याला।
' कपटी- शकुनी ' ठरवितात
प्रभू -रामचंद्राला ।
कसे वागावे येथे ?
प्रश्न पडतो मनाला ।
मग एकच उपाय
दिसतो खास यावरला ।
'सदैव खोटे बोलणे '
जमणार नाही मला ,
पण खरेही कधी
सांगणार नाही कुणाला ।
-विश्वकुमार.
विनोद
केला विनोद तुजवरी
माझा न दोष काही.
असते एक अन कधी ;
भासते दुसरेच काही !
विनोदासाठी विनोद केला ;
दुजा न भाव काही .
होतो जसा काल मी ;
आहे तसाच आजही !
-विश्वकुमार.
निवडणूक
लोकशाहीचा घोडा
गाढवांपुढे अडला .
शेषन सारखा माणूसही
निवडणुकीत पडला !
कारण त्याला फक्त
एक गोष्ट कळली नाही;
गाढवांचा प्रतिनिधी कधीही
घोडा होऊ शकत नाही.
जगाचा न्याय
असा हा आंधळा.
सफरचंद टाकुनि,
खाती भोपळा !
- विश्वकुमार.